Source
जल संवाद
सन 2003-04 साली कार्यान्वित झालेली सहकारी संस्था तिच्या ध्येयनिष्ठ कामगीरीत आजपर्यंत अग्रेसर राहिली आहे. त्यामुळे या संस्थेस अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत व प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन दिले आहे. मुक्तागीरी पाणी वापर सहकारी संस्थेने पाणी वापर कमी करून पाण्याची बचत केलेली आहे. या सोबत 100 टक्के पाणीपट्टी अग्रीम भरून थकबाकी निरंक ठेवली आहे. त्यामुळे शासनाने सतत संस्थेस आतापर्यंत देखभाल दुरूस्ती अनुदान प्राप्त करून दिले आहे. लोकसहभागातुन, श्रमदानातुन यावर्षी मायनर दुरूस्तीची कामे करून, विश्वेश्वरय्या कालवा दुरूस्ती अभियान, समर्थपणे चालवून सिंचन क्षेत्रात वाढ केली आहे. संस्थेकडे असलेली शासनाची कालवा संपत्ती व्यवस्थितरित्या सांभाळलेली आहे.
संस्थेच्या सिंचन क्षेत्रातील लाभधारकास अन्य शासकिय / अशासकिय संस्थेमार्फत पीक कर्ज म्हणून दिड कोटी वाटप केले आहेत. यामुळे लाभधारकांची समृध्दी बघणारी ही संस्था महाराष्ट्रात प्रथम क्रमांकावर आहे. त्यामुळे आयटीसी कंपनी तर्फे संस्थेचा चेअरमन या नात्याने संस्थेचा सत्कार केला आहे. शेतक-यांना माती परिक्षण, कृषी अधिका-यामार्फत उपलब्ध करून मातीचा कस सुधारण्यास मार्गदर्शनपर शिबिरे घेतलेली आहेत.
पाणी वाटप हे संस्थेचे ध्येय नसून त्या पाण्याचा वापर करून कृषी उत्पन्न वाढवून मातीचा कस कायम ठेवण्यासाठी गांडुळ खत उत्पादन यांची सोपी पध्दती तंत्रज्ञान अवगत करून दिले आहे. हयामुळे यापूर्वी वाल्मी संस्था औरंगाबाद व भाऊराव सहकारी साखर कारखाना यांनी आयोजीत केलेल्या शेतकरी प्रशिक्षण शिबीरामध्ये यापूर्वी कारखान्याचे चेअरमन श्री. गणपतराव तिडके यांनी मुक्तागीरी संस्थेच्या वतीने माझा सत्कार करून संस्थेस प्रोत्साहन दिले आहे. त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे.
स्टँट बँक ऑफ इंडीया शाखा डोंगरकडा/ नवा मोंढा नांदेड यांच्या वतीने लाभक्षेत्रातील लाभधारकांना किसान क्रेडीट कार्ड मिळवून देऊन शेतक-यांचे जीवनमान उंचावण्यास संस्थेने सहकार्य केले आहे. या सोबत लाभधारकांना भावी जिवनाची सुरक्षितता म्हणून पीक विमा / जीवन विमा देखील उपलब्ध करून दिलेला आहे. शेतक-यांसाठी शेतकरी वाचनालय उपलब्ध करून कृषी माती व पाणी परिक्षण करण्यासाठी पिकांचे आधुनिक तंत्रज्ञान व अद्यावत बाजारभाव घरबसल्या कळावेत व त्यांचे श्रम वाचून त्यांची शक्ती कृषी कार्यात खर्ची व्हावी याकरीता इंटरनेट माध्यमसुध्दा उपलब्ध करून दिले आहे.
प्रकल्पातील एकमेव आधुनिक तंत्रज्ञान राबवणारी ही मुक्तागीरी संस्था एकमेव असल्याने या संस्थेस महाराष्ट्राचे तत्कालीन महसूल मंत्री मा. अशोकरावजी चव्हाण यांनी भेट दिली आहे. प्रकल्पातील प्रथम क्रमांकावर निर्माण झालेली ही संस्था हिंगोली जिल्हयाच्या सिंचन क्षेत्रात असून नांदेड जिल्हयाचे कार्यक्षेत्र असलेली संस्था असल्यामुळे भारत सरकारचे तत्कालीन गृहमंत्री मा. शंकररावजी चव्हाण यांनी सत्कार करून माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याची दखल घेतली आहे त्यामुळे मी त्यांचा आजन्म ऋणी आहे. पाणी वापर संस्थेचे ध्येय पूर्ण करण्यात उद्योगशील असलेली ही संस्था व या विकासाचा आलेख बघण्यासाठी या संस्थेस भेट देण्यासाठी अमेरिकेच्या निशीगंध कृषी विद्यापीठातील अनिवासी भारतीय विद्यार्थी व अमेरिकन विद्यार्थीनी शेरा मॅडम यांनी संस्थेस भेट दिलेली आहे व सोबत शेतक-यांच्या भेटी घेऊन त्यांना मार्गदर्शनासाठी कार्यतत्पर असलेले प्रकल्पाचे अधिकारी तथा कर्मचारी यांचे संस्था ऋण व्यक्त करीत आहे.
कै. डॉ. शंकररावजी चव्हाण पुरस्कार कृष्णा कालवा पाणी वापर संस्था मालेगाव यांनी जाहीर केला ज्यासाठी आम्ही प्रस्ताव करून पाठविला. सन 2008 साली प्रथम पुरस्कार आमच्या संस्थेस मिळाला. मा. भरतभाऊ कावळे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कार, स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन संस्थेचा गौरव करण्यात आला. सन 2009 साली याच कार्यक्रमात पाटबंधारे विभागाकडून उर्ध्व पेनगंगा प्रकल्प, पूर्णा पाटबंधारे विभाग व नांदेड पाटबंधारे विभाग यांचे कार्यकारी अभियंता यांचे उपस्थितीत जेष्ठ जलतज्ञ मा. माधवरावजी चितळे यांचे हस्ते विषेश पुरस्कार व प्रमाणपत्र देऊन संस्थेचा गौरव करण्यात आला.
आमची संस्था नेहमी सक्रिय कामात सहभाग घेते. आयटीसी तर्फे मिळणारे ज्वारीचे बियाणे संस्था सभासदांना मोफत वाटप करते. व त्याची पाणीपट्टी सुध्दा माफ करण्यात येते.
आमच्या संस्थेचे संचालक मंडळ व सभासदांमध्ये एकसुत्रीपणा आहे. अशा प्रकारे महाराष्ट्रातील सर्व संस्थांनी कामे केली तर पाटबंधारे खात्यास एक प्रकारचे चांंगले सहकार्य लाभेल. ही आशा बाळगतो. ʅजयहिंद जय महाराष्ट्रʆ
चेअरमन, रामराव मारोतराव कदम, मुक्तागीरी पाणी वापर सहकारी संस्था म. देळूब बु. ता. अर्धापूर जि. नांदेड